
मंगळवारी किंवा बुधवारी आचारसंहिता लागण्याची शक्यता
● मंत्रिमंडळाची आज सकाळी साडेनऊ वाजता बैठक; विधान परिषदेच्या १२ रिक्त जागाही भरणार
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता रविवारी लागू होणार असल्याची चर्चा असताना हा मुहूर्त टाळला आहे. आता मंगळवारी किंवा बुधवारी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप आचारसंहिता लागू केलेली नाही. आता मंगळवारी किंवा बुधवारी आचारसंहिता लागू होईल, अशी नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मिळालेला वेळ पाहता राज्य सरकार आणखी काही लोकप्रिय निर्णय घेण्यासाठी सोमवारी सकाळी मंत्रिमंडळ बैठक घेणार आहे.
दरम्यान विधान परिषदेच्या राज्यपाल नामनियुक्त १२ नियुक्तीचा मुद्दा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. रविवारी आचारसंहिता लागेल, अशी चर्चा महाविकास आघाडी सरकारने या १२ जागा भरण्याचा निर्णय घेतला. पण तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्याला मंजुरी दिली नाही. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे… या प्रकरणाचा निकाल प्रलंबित आहे. मात्र, नव्या १२ सदस्यांच्या यादीला राज्यपालांची मान्यता घेऊन त्यांच्या नियुक्त्या करण्याच्या हालचाली सुरू आहेत. १२ जागांपैकी महायुतीतील तीन पक्षांच्या कोणाच्या किती जागा भरायच्या यावर मतभेद असून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.