बोधकथा क्र. : 39
बोथकथेचे नाव : खरा मित्र

एका गावात दोन मित्र राहत होते. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. एके दिवशी त्यांनी जंगलात फिरायला जायचं ठरवलं. दोघेही आनंदाने जंगलात फिरायला गेले. परंतु काही अंतरावरच, एका सिंहाचा आवाज त्यांच्या कानावर पडला. सिंह जवळच होता.
पहिला मित्र घाबरला आणि पळत जाऊन एका झाडावर चढला. दुसऱ्या मित्राला मात्र झाडावर चढता येत नव्हता. त्याने पटकन युक्ती लढवली आणि मेल्यासारखे निपचित जमिनीवर पडून राहिला. सिंह त्या जमिनीवर पडलेल्या मुलाजवळ आला, त्याने त्याचा वास घेतला, आणि काही वेळानंतर सिंह त्याला तसाच सोडून निघून गेला. कारण सिंह मेलेल्या प्राण्यांना कधीच खात नाही.
सिंह निघून गेल्यानंतर पहिला मित्र झाडावरून खाली उतरला आणि दुसऱ्या मित्राला म्हणाला, “अरे, सिंह तुझ्या कानात काय म्हणाला?” दुसऱ्या मित्राने शांतपणे उत्तर दिलं, “सिंहाने मला सांगितलं की, जो मित्र संकटात सोडून पळतो, तो खरा मित्र नाही!”
तात्पर्य :
संकटाच्या वेळी जो मदतीस धावून येतो तोच खरा मित्र असतो.